Breaking News
शिवजयंती उत्सव
शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी वर झाला. हे या महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेल्या कोणाला सांगायची गरज नाही. या मातीत जन्माला येणा-या प्रत्येकाच्या मनावर शिवाजी महाराज हे नाव कोरलेले असते. म्हणूनच आज ३९० वर्षे उलटूनही नवीन पिढीच्या मनात सुध्दा महाराजांबद्दल तितकाच आदर आहे. पिढ्यानुपिढ्या महाराज आपल्यासाठी प्रेरणादायीच आहेत.
शिवजयंती जवळ आली की, अमिताभ बच्चन यांचे एक वाक्य आठवते. "ईस देश में दो भारत बसते है". तसेच शिवजयंती जवळ आली की वाटते ह्या राज्यात दोन महाराष्ट्र आहेत.
एक ज्यांना वाटते शिवजयंती ही तारखे नुसार साजरी व्हावी. कारण तारीख ही सर्वत्र सारखीच असते. त्यानुसारच भारतात सर्वत्र गांधी जयंती, बालदिन तसेच स्वतंत्रदिन, प्रजासत्ताक दिन हे तारखेनुसारच साजरा केले जातात. म्हणून शिवजयंती पण तारखेनुसार साजरी करणारा एक महाराष्ट्र.
दुसरे ज्यांना वाटते शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी. कारण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. ह्या भारतात देवांचे जन्म दिन तिथीनुसार साजरे केले जातात. कृष्णजन्म, महाशिवरात्र, गणेश जयंती हे तिथीनुसारच साजरे होतात. म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरा करणारा महाराष्ट्र.
शिवजयंती तारखेनुसार साजरा करावी की तिथीनुसार साजरा करावी हा मुळात वादाचा विषयच नाही. महाराज एकच असे आहेत ज्यांचा जन्मदिन दोनदा साजरा होतो. हा जन्मदिन रोजच साजरा व्हावा कारण महाराज हे आपल्याला प्रेरणादायी आहेत. शिवाजी महाराजांचे दावपेच समजून घेवून आपण आजही आपल्या जिवनांत आलेल्या संकटांवर मात करू शकतो. शिवचरित्र समजून घेवून पुरूषांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, रस्त्यांनी येता-जाताना एखादी महिला दिसली तर तीला आपल्याकडे पाहून भिती नाही तर आधार वाटला पाहिजे अशी आपली वागणूक आणि नजर असली पाहिजे. एखाद्या महिलेची कोणी छेड़ काढत असेल तर, त्याला तिथेच ही महाराजांची भूमी आहे हे दाखवून दिले पाहिजे.
जीजामाता यांचे चरित्र समजून घेतले तर, महिलांना हे सांगायला नको जीजाऊ मुळेच शिवाजी, राजे झाले. जीजाऊ शिवाजींना लहानपणापासूनच राजे हाक मारत असत. तेव्हा ते राजे झाले.
हे सर्व समजून घेवून आपण यांचा जिवनांत आचरण केल्यास आपण स्वतःला घडवून एक उत्कृष्ट समाज घडवू शकतो. मग रोजच शिवजयंती साजरी होईल. तरच ही शिवाजी महाराजांची भूमी आहे हे सिद्ध होईल.
प्रदीप मुरूडकर , नवी मुंबई.
रिपोर्टर