स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक
- by Santosh Jadhav
- Nov 20, 2021
निश्चय केला ‘आला नबंर पहिला’
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक
नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नवी मुंबई शहरास १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ विशेष समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते, केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिकेस या विशेष समारंभात आणखी तीन महत्वाचे सन्मान प्राप्त झाले असून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबई देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे. तसेच ‘कचरामुक्त शहरांमध्ये’ नवी मुंबई महानगरपालिकेने आपले ‘फाईव्ह स्टार मानांकन’ कायम राखले आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास ‘वॉटर प्लस’ या सर्वोच्च मानांकनाने सन्मानीत करण्यात आले. या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ २ उपआयुक्त अमरीश पटनिगेरे उपस्थित होते.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये देशभरातील ४३२० शहरे सहभागी झाली होती. यामध्ये १० ते ४० लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराच्या पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकेस गौरविण्यात आले. शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केले आहेत. यावर्षी ‘स्वच्छ सर्वंक्षण २०२१’ मध्ये जुलै ते ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या तिमाही कालावधीच्या ३ सत्रांत कागदपत्रे तपासणी तसेच नागरिकांचे अभिप्राय या पध्दतीने परीक्षण करण्यात आले. याशिवाय अखेरच्या परीक्षणात केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांव्दारे पूर्वकल्पना न देता महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची ३ वेळा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी करताना परीक्षण समिती सदस्यांकडून कोणत्याही नागरिकाशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता अॅप, दूरध्वनी यावरूनही कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून त्याच्या शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav